काल संध्याकाळी कामावरून घरी येत होतो. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं. ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली होती म्हणून खिडकीतून बाहेर बघत होतो. सिग्नलवरच्या एका कोपऱ्यात, एका जुन्या दुकानाच्या आडोशाला एक ७०-७५ वर्षांची आजी डोक्यावर प्लास्टिकची पिशवी घेऊन बसली होती. समोर टोपलीत काही जुड्या मेथी आणि कोथिंबीर होती, जी पावसामुळे निम्मी भिजली होती.
तेवढ्यात तिथे एक मोठी कार येऊन थांबली. काचा खाली झाल्या. आतून एका उच्चभ्रू (High Class) बाईने विचारलं, "आजी, मेथी कशी दिली?"
आजी कुडकुडत म्हणाली, "ताई, २० रुपयाला जुडी आहे. घ्या ना, ताजी आहे."
ती बाई नाराजीने म्हणाली, "काय २० रुपये? आजी १० रुपयाला देणार तर द्या, नाहीतर नको."
आजीने विनवणी केली, "ताई, पावसात भिजून आणलीये, २० रुपये तरी मिळू दे, मला अजून घरी जायचंय."
त्या बाईने काच वर केली आणि गाडी पुढे घ्यायला ड्रायव्हरला सांगितलं. आजीने हतबल होऊन हाक मारली, "थांबा ताई, घ्या १० रुपयालाच घ्या, पण घ्या..."
हे दृश्य बघून मला प्रचंड चीड आली. आपण पिझ्झा-बर्गर आणि मॉलमध्ये हजरो रुपये टॅग न बघता उधळतो, वेटरला ५०-१०० रुपये टीप देतो, पण ऊन-पावसात राबणाऱ्या या गरिबांच्या पोटावर ५-१० रुपयांसाठी पाय देतो?
मी गाडी साईडला लावली आणि त्या आजीजवळ गेलो.
मी विचारलं, "आजी, एवढ्या पावसात का बसलाय? मुलंबाळं नाहीत का?"
त्यांनी जे उत्तर दिलं, ते ऐकून माझी मान शरमेने खाली झुकली. त्या म्हणाल्या, "बाळा, मुलगा होता पण दारूच्या व्यसनाने गेला. आता म्हातारा घरी अंथरुणाला खिळून आहे. त्याच्या औषधासाठी आणि दोन वेळच्या भाकरीसाठी बसावं लागतं. कोणापुढे हात पसरण्यापेक्षा हे कष्टाचं बरं रे बाबा..."
त्यांच्या डोळ्यातलं पाणी पावसाच्या पाण्यात मिसळत होतं. स्वाभिमानाची ही व्याख्या मला कोणत्याही शाळेत शिकायला मिळाली नव्हती.
मी त्यांच्याकडची सगळी भाजी विकत घेतली आणि वरून ५०० रुपये दिले. त्या नको म्हणाल्या, पण मी म्हणालो, "आजी, हे भाजीचे नाहीत, तुमच्या कष्टाचे आणि स्वाभिमानाचे आहेत. आज लवकर घरी जा."
त्या थरथरत्या हातांनी त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, "सुखी राहा राजा..." तो आशीर्वाद मला लाखमोलाचा वाटला.
मित्रांनो रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांशी कधीच जास्त मोलभाव करू नका. ते नफा कमवण्यासाठी नाही, तर फक्त त्या दिवसाचं पोट भरण्यासाठी धडपडत असतात. तुमचं ५-१० रुपये वाचवणं त्यांच्यासाठी खूप मोठं नुकसान असू शकतं. मदत नाही केली तरी चालेल, पण त्यांच्या कष्टाची किंमत कमी करू नका.
-काल्पनिक
Post a Comment
0 Comments